Sunday, 16 August 2015

चिखलातलं कमळ



वाघ्या - मुरळी असणाऱ एक जोडपं गावो - गावी जाऊन जागरण - गोंधळ करून आपली गुजराण करीत असे. 
एके दिवशी दोघे एका पाटलाच्या वाड्यावर जागरणासाठी जातात. 

रात्रभर नाच-गाणं चालतं. 
सकाळी उठून दोघे आपली बिदागी घेऊन जाणार 
इतक्यात पाटील दोघांना थांबवतो आणि वाघ्याला मुरळीला सोडून जाण्याची एकूण रक्कम विचारतो.

सुरवातीला वाघ्या नकार देतो मात्र पाटील भरपूर पैसे देताहेत म्हटल्यावर तिला तिथेच सोडायला तयार होतो.

आता पाटलीन गावात आणि मुरळी शेतात असं आयुष्य सुरु होतं... 

एके दिवशी पाटलीनीचा छोटा एकुलता एक मुलगा आजारी पडतो. 
डॉ. वैद्य काही केल्या बरा होत नाही.
ही बातमी मुरळीच्या कानावर जाते.
अडाणी अशिक्षित मुरुळी येल्लू आईकडे धावा घेते.
 नवस बोलते,

 " हे येल्लू आई हा आमच्या घराण्याचा वारस आहे,
वंशाचा दिवा आहे हा दिवा असाच तेवत 
राहू दे. 
त्याला इझु देवू नगंस.

बोला-फुलाला गाठ पडते मूल बर होत.
काही दिवस जातात आणि मुरळी गर्भार होते.
९ महिने ९दिवस भरतात आणि मुरळी प्रसूत होते.
एका सुंदर गोंडस मुलीला जन्म देते.

मुरळीची मुलगी पाटलीनीचा मुलगा दोघं वाढत जातात.
मोठी होतात.
वयात येतात उपवर होतात...
आणि एके दिवशी पुन्हा एकदा मुलगा आजारी पडतो.
काही केल्या तो बरा होत नाही...
इकडे व्यसनी वाघ्या म्हातारा झालेला, 
सगळे पैसे संपलेले... 

फिरता-फिरता त्याच गावात येतो त्याची नजर मुरळीच्या मुलीवर पडते. 
मुलगी मुरळी हाताशी आली तर म्हातारपण सुखात जाईल...
पाटील मुलाच्या आजारने चिंताग्रस्त आहे 
हे तो हेरतो अन डाव टाकतो...

" पाटील जी लय जुलमी दुखनं हाय.
 कौल लावावा लागलं..."

हतबल पाटील वाघ्याच म्हणनं ऐकतो. 
त्या रात्री देवीला कौल लावला जातो.
वाघ्या घुमाय लागतो. 
अन बडबडतो, 

" पाटील...
 घरात कुणी नवस बोललाय का..?" 

न्हाई तं...

" तुम्ही नसल पण आत जाऊन तुच्या मालकिणीला विचारा. "

पाटील आत जातो बायकोला विचारतो.
ती नकार देते.
पण शेतात जाऊन मुरळीने काही नवस बोलला का हे विचार अस सांगते.

अगतिक पाटील अन त्याची बायको दोघे शेतात जातात. मुरुळीला विचारतात,

 " बाई ग, काही नवस बोललास का..? "

वीज चमकावी तशी मुरुळी वळून बघते 
आणि एकदम़ंच...

 " म्या बोलला होता नवस.
 माझ्या गीनानात क्ष गवऱ्या पडल्या बघा.
 म्या नवस बोलला होता.
 येल्लू आईला म्हणलं होत...

" आये धाकल्या मालकास्नी बरं कर.
हा आमच्या घराण्याचा वारस हाय. 
हा वंशाचा दिवा असाच तेवत राहु दे.
इझु देवू नगस...
बदल्यात माझ पाहिलं पोर मी तुला 
अर्पण करीन. 
पोरगी झाली तर मुरळी करीन न पोरगं झालं तर वाघ्या सोडीन.
मला पोरगी झाली पण मी  नवस बोलला अन इसरले.."

वाघ्या चा डाव यशस्वी झाला.
नवस फेडायची तयारी तयारी सुरु झाली.
मुरळीची मुलगी दिसायला नितांत 
सुंदर, निरागस.
चार बुकं शिकलेली काय करावं त्या 
निष्पाप कळीने..?

नवस फेडायचा दिवस उजाडला . 
मुरळीने आपल्या लाडक्या लेकीला न्हाऊ घातलं...
तिच्या लांब सडक केसांना ती पानाव्लेया डोळ्यांनी निरखू लागली.
तिला जवळ घेतलं...

इतक्यात नुकतीच अक्षर ओळख झालेली ती मुलगी निष्पापपणे आईला विचारते...

" आई ग मुरळी म्हणजे काय ग..? "

" बाई ग मुरीली म्हणजे देवाची बायको..." 
अडाणी आई उत्तरली...

" आई गं, तू मुरळी आहेस
 म्हणजे नक्की काय गं..? " 
मुलगीं.

" बाई गं मी मुरळी झाले म्हणजे माझं लग्न देवाशी लागलं.." 
पुन्हा आईं...

"आई गं तुझं लग्न देवाशी म्हणजे देव तुझा कोणं..? "

" बाई गं माझं लग्न देवाशी म्हणजे देव माझा नवरा..."

" आई गं देव तुझा नवरा म्हणजे तू देवाची कोण..? "

" बाई गं देव माझा नवरा म्हणजे मी देवाची बायको.."

" आई गं तू देवाची बायकों. 
मी तुझी मुलगी मग मी देवाची कोण..? "

" बाई ग तू माझी मुलगी म्हणजे तू देवाची सुध्दा मुलगीच.."

" आई गं मी देवाची मुलगी मग देव माझा कोण..? "

" बाई गं तू देवाची मुलगी म्हणजे देव तुझा बाप.."

" आई गं मी देवाची मुलगी, आता मला मुरळी करायचं म्हणजे माझ लग्न कोणाशी..?"

" बाई गं तुला मुरळी करायचं म्हणजे तुझं लग्न देवाशी..."

" आई गं आत्ताच तर तू म्हणाली होतीस की देव माझा बाप.
मग माझं लग्न माझ्याच बापाशी लावणारा हा कसला धर्म..? 
असा धर्म तू सांगत असशील तर आम्ही नाकारतो हा धर्म.
अशा सैतानी रूढी परंपरा...

वर सांगितलेला प्रसंग हा इथल्या एकूण व्यवस्थेची चिरफाड करण्यास पुरेसा ठरतो.
कर्म कांडत अडकलेला आणि माणूसपण नाकारणारा धर्म मिरवण्यापेक्षा माणूसपण जपणं महत्वाचं...

✒ प्रा. सुषमाताई अंधारे 

No comments:

Post a Comment